
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
‘तु मला खूप आवडतेस’, असं म्हणत एका अल्पवयीन मुलीचा हात धरुन तिला स्वतःकडे ओढत लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केल्याप्रकरणी नेवासे तालुक्यातल्या सोनई पोलिसांनी सौरभ उर्फ बुट्ट्या भास्कर ठाकूर आणि सुनील ज्ञानदेव बर्डे (दोघे रा. शिरेगाव तालुका नेवासा जिल्हा – अहिल्यानगर) या दोन वाळू तस्करांच्याविरुद्ध काल (दिनांक १३ ऑगस्ट) रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
वाळू तस्कर सौरभ ठाकूर आणि सुनील बर्डे हे दोघे एका शाळेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्यांच्या सिल्व्हर रंगाच्या अल्टो कारमध्ये सदर अल्पवयीन मुलीच्या इच्छेनुसार घेऊन गेले. त्यानंतर तिचा हात पकडून ‘तु मला खूप आवडतेस’, असं म्हणत त्या अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने कृत्य केले. त्यानंतर हा प्रकार जर कोणाला सांगितला तर तुला ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली असल्याचं संबंधित अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे..
दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार सोनई पोलिसांनी बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेतले आरोपी पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव हे करत आहेत.
सोनई पोलिसांनी वाळू तस्करीकडे जरा लक्ष द्यावं…!
नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळील शिरेगावच्या नदीतून वाळू तस्कर सौरभ ठाकूर आणि सुनील बर्डे हे दोघे बैलगाडीने नदीच्या बाहेर आणून टाकत होते आणि त्यानंतर डंपर्समधून सदरची वाळू संपूर्ण नेवासे तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर विकत होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समजली. विशेष म्हणजे हे दोन्ही वाळू तस्कर शासनाची कुठलीही ‘रॉयल्टी’ भरत नसल्याचंसुद्धा सांगण्यात येत आहे. वाळू तस्करीतून कमविलेल्या अफाट पैशांचा या दोघांना खूपच माज आलेला होता. शिरेगावच्या नदीतून या वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळू उचलली आहे.
दिवसभरात या वाळू तस्करांचे अनेक डंपर्स तालुक्याच्या विविध भागांत वाळू पोहोचविण्याचं काम करत आहेत. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी या वाळू तस्करीकडे सोनई पोलिसांनी जरा लक्ष द्यावं, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.
मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी नक्की कोणाची…?
सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळे पोलिसांसमोर ही मोठीच डोकेदुखी ठरत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचं खासगीत बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी पालक, शिक्षक की पोलीस यापैकी नक्की कोणाची, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अर्थात शाळेत असल्यानंतर मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी ही शिक्षकांचीच असते. घरी आल्यानंतर मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी ही तिच्या पालकांचीच असते, हे कोणीही नाकारु शकत नाही. मात्र शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा सुटण्यापूर्वी शाळेच्या बाहेर जर असा प्रकार घडला तर त्याची जबाबदारी नक्की कोणाची? या अशा घटनांना नक्की आळा कोण घालणार आणि अल्पवयीन मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी नक्की कोणाची, हाच खरा प्रश्न आहे







