
जून-जुलैतील शिक्षणाचा सुवर्णकाळ वाया; शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा डोंगर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची तीव्र भावना पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील जून व जुलै हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच काळात अभ्यासाचा पाया मजबूत केला जातो. मात्र, शिक्षकांना शाळेबाहेरील प्रशासकीय कामात गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे.
शिक्षकांचे मुख्य कर्तव्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे असताना, त्यांच्यावर SIR कामकाजाचा अतिरिक्त भार टाकण्यात आल्याने ते प्रचंड ताणतणावाखाली काम करत आहेत. एकीकडे शाळेतील अध्यापन, तर दुसरीकडे SIR चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणारा पाठपुरावा, अहवाल, बैठका आणि कामाचा तगादा यामुळे शिक्षकांची अक्षरशः दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडे इतर अनेक विभागांतील कर्मचारी उपलब्ध असतानाही केवळ शिक्षकांनाच या कामासाठी वारंवार का नियुक्त केले जाते, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्षणापेक्षा इतर कामांना प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
साकळी गावाचे उदाहरण पाहिले तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. येथे जिल्हा परिषद शाळेतील मराठी माध्यमाचे तब्बल तीन शिक्षक, उर्दू माध्यमाचा एक शिक्षक तसेच इतर शिक्षण संस्थांतील चार शिक्षक अशा एकूण आठ शिक्षकांची SIR कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एका गावातच इतक्या शिक्षकांना शाळेबाहेरील कामासाठी नियुक्त केले जात असेल, तर संपूर्ण जिल्हा आणि राज्यातील परिस्थिती किती गंभीर असेल, याची सहज कल्पना येते.
यामुळे अनेक वर्गांमध्ये अध्यापनाचा वेग मंदावला असून विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा काळच जर प्रशासकीय कामांमध्ये गेला, तर त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांकडून SIR काम वेळेत पूर्ण न झाल्यास वरिष्ठ अधिकारी सातत्याने जाब विचारत असल्याचेही सांगितले जात आहे. “काम का झाले नाही?”, “दिलेले उद्दिष्ट का पूर्ण झाले नाही?” अशा प्रश्नांचा भडिमार होत असल्याने शिक्षक मानसिक तणावाखाली काम करत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या आरोग्यावर किंवा जीवितावर विपरीत परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त सतत विविध शासकीय कामांमध्ये गुंतविण्याची पद्धत तातडीने थांबविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर ठेवणे ही शिक्षण व्यवस्थेसाठी चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने आणि शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन SIR तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ द्यावा आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान तातडीने थांबवावे, अशी जोरदार मागणी शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून होत आहे.







