
रावेर प्रतिनिधी उमेश तायडे
निंभोरा : निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) येथील सबस्टेशनजवळील वाड्यावरून दोन शेतकऱ्यांच्या चार गायी चोरीला गेल्याची घटना २९ जुलै २०२६ रोजी रात्री घडली होती. चोरीला गेलेल्या गायींची एकूण किंमत ६६ हजार रुपये होती. याप्रकरणी निंभोरा पोलिसांनी तपास करून चार आरोपींना अटक केली आहे.
निंभोरा बुद्रुक येथील लक्ष्मण गोविंदा बोढे यांच्या दोन गायी, तसेच शेजारील वाड्यातील शेतकरी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांच्या दोन गायी चोरीला गेल्या होत्या. बोढे यांच्या दोन गायींची किंमत २२ हजार रुपये, तर नेमाडे यांच्या दोन गायींची किंमत ४४ हजार रुपये होती. गायींचा शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. १७२/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीदार, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला.
तपासादरम्यान पोलिसांनी हयात शेख मासून मन्यार (२५, रा. चिनावल), शेख आवेश शेख एजाज खान (२०, रा. सावदा), शेख राजीद शेख शरीफ (२३, रा. रसलपूर) आणि शेख नासीर शेख चांद (४५, रा. वरणगाव) या चार आरोपींना अटक केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास निंभोरा पोलीस करत आहेत







