
नवी दिल्ली/प्रशांत बाफना
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळं वळण आले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाले. जंतर-मंतरवर जाऊ त्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
जंतर-मंतरवरून मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आणि आपल्या मायबापांनी यांना मतदान केले. आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केले. आपल्या जिल्ह्यांनी तालुक्यांनी यांना मतदान केले आहे. पण आज हेच आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा- बाळांवरती उलटले आहेत. यांना उलटे करण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आणि राज्यातील गोरगरीब जनतेमध्ये आहे हे यांच्या लक्षात नाही आहे.
तसंच, ‘जर या पुढच्या काळात तुम्हाला जर कुठे धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. सर्व देश, राज्य तुमच्यासोबत आहे एवढाच शब्द मी देतो. पुन्हा जर लाठीचार्ज केला तर महाराष्ट्रात यांना फिरू देणार नाही.’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे. इथे जी पोरं बसले आहेत त्यांची तळमळ आहे. पण एखाद्या निर्णयामुळे त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत राहिले तर न्याय मिळतो. जंतर मंतरची जागा ही आंदोलनाची जागा आहे त्यामुळे इथे ते काही करू शकत नाहीत त्यामुळे आंदोलकांनी ही जागा सोडून नये.’, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले







