
पोलिसांना काळजी घ्यावी लागणार । मुकुंदनगरमधील कथित टोळ्यांना आणि त्यांना पोसणारा कोण?
सारिपाट / प्रशांत बाफना
कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्यानंतर आणि नागरिकांच्या मनात भिती, दहशत निर्माण झाल्यानंतर खाकीची अब्रू वेशीवर टांगली गेली. धीरज परदेशी याची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली ती पहाता दहशत निर्माण करण्याचाच हा प्रकार होता. परदेशीच्या मृत्यूनंतर शहरात त्याचे पडसाद उमटणार होतेच. झालेही तसेच. शहरात जातीय तणाव वाढत असल्याचा रिपोर्ट साऱ्याच गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. तरीही त्यावर उपाययोजना करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले नाही. आता परदेशीच्या हत्येनंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जातीय सलोखा निर्माण व्हावा या अनुषंगाने बैठका घेण्याचे दिवस संपुष्टात आले आहेत असेच म्हणण्याची वेळ आली आहे. भाईचारा वाढीस लागावा यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होण्याची गरज आहे. शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर नक्कीच आला आहे. पोलिसांना काळजी घ्यावीच लागणार आहे. कधीकाळी नगर शहर हे जातीय दंगलीचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता ते पुन्हा त्याच वळणावर आले असल्याने ही बाब कोणासाठीच भूषणावह नाही. विशेषत: मुकुंदनगरमधील व्यसनाधीन तरुण आणि त्यांना पोसणारे कथीत नेते शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची गरज आहे. पोलिस अधीक्षक सुदर्शन ममुका हे धडाडीचे अधिकारी आहेत. खमकी भूमिका घेण्याची गरज आहे. कायद्याचा धाक आता त्यांना निर्माण करावाच लागेल आणि त्यासाठी एसपी साहेबांना दंडुका हाती घ्यावाच लागेल.

एसपी साहेब, रस्त्यावर उतरलात चांगले झाले!
धीरज परदेशी हत्याकांडानंतर शहरात तणाव निर्माण झाला. पुणे- संभाजीनगरहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्याची वेळ पोलिसांवर आली. संवदेनशिल रस्ते आणि चौकांची पाहणी करण्यासाठी आज दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले. पण, त्यांच्यावर ही वेळ का आली? शहराशी निगडीत पाचही पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि त्यांचे डीबी पथक नक्की काय करतेय? काही पोलिस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी असणारे खुलेआम संबंध सर्वश्रूत आहेत. त्यांच्याच ओंजळीने जर त्या पोलिस ठाण्याचा प्रभारी पाणी पित असेल तर गुन्हेगारांचे फावणारच! एसपी साहेब, अशा कर्मचाऱ्यांचा शोध घ्या आणि त्यांना अकोले- कर्जतचा रस्ता दाखवा!
राजकीय पोळीचे ठिक, पण आयते कोलीत तर का दिले जाते?
गेल्या दीड- दोन वर्षांपासून शहरात जातीय तणाव वाढत चालला आहे. पोलिसांनाही याची जाणिव आहेच. विशेषत: हिंदू- मुुस्लिम या दोन समाजातील तणाव आता टोकाला गेल्याचे दिसते. हिंदुत्ववादी संघटनांकडून संधी मिळाली की त्याबाबत आवाज उठवला जातो. कधीकाळी नगर शहर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता ते पुन्हा त्याच वळणावर येऊन ठेपले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप नवीन नाही. मात्र, अशा घटनाच होणार नाहीत याची काळजी कोणीतरी घेतलीच पाहिजे!
लवजिहाद प्रकरणातील विरोधाने परदेशीचा काटा काढल्याची चर्चा!
धीरज रजपूत हा हिंदुत्ववादी संघटनेत फारसा सक्रिय नसला तरी हिंदू चळवळीत थोडाफार काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. मुकुंदनगरमध्ये हिंदू समाजाची एक तरुणी पळवून आणली गेली होती आणि त्या प्रकरणात धीरज याने टोकाची भूमिका घेत त्या मुलीची सोडवणूक केली होती. त्यातूनच हा हल्ला झाल्याची चर्चा होत आहे. पोलिस त्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. महापालिकेच्या किरकोळ कामातून हा हल्ला नक्कीच झालेला नाही. महापालिका कर्मचाऱ्या मार्फत निरोप पाठवून परदेशी याला बोलावून घेऊन तेथे हल्ला केला हे पहिल्या टप्प्यात समोर आले आहे.
नेमकं काय घडलं होतं मुकुंदनगरमध्ये?
पथदिवे दुरुस्तीचे काम करणाऱ्या संस्थेला मुकुंदनगर येथे पथदिवे दुरुस्तीसाठी पाठवले होते. अक्षय मुळे, काव्य गणेश तावरे आणि धीरज रजपूत असे तिघे तेथे गेले होते. मुळे आणि तावरे हे दोघे पथदिवे दुरुस्त करण्यासाठी इमारतीवर गेले होते, तर धीरज खाली थांबला होता. त्यावेळी तेथे 6 ते 7 जण आले आणि त्यांनी लोखंडी दांडक्याने धीरजवर जीवघेणा हल्ला चढवला. मुळे आणि तावरे बचावासाठी पुढे आले, त्यांनी हस्तक्षेप केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
हैदराबाद कनेक्शनचा देखील शोध घेतला जाणार का?
परदेशी याच्यावर हल्ला करुन पसार झालेल्या प्रमुख तीन आरोपींना हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगरहून ते सरळ हैदराबादकडे पळून गेले. अक्षय कैलास मुळे याने फिर्याद दिल्यानंतर आरोपींचा शोध सुरू झाला आणि त्यानुसार मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्ताकिम अस्लम सय्यद यांचा शोध घेत त्यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली. या तिघांना हैदराबादमध्ये कोणी संरक्षण दिले याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
युनूस शेखने आखला कट!
मनपाच्या विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीसाठी ई-स्मार्ट कंपनीची नेमणूक केली आहे. धीरज रजपूत या कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा. मयत धीरज परदेशी याला महापालिकेत वायरमन पदावर कार्यरत असलेल्या युनूस शेख याने मुकुंदनगरमध्ये बोलावून घेतले. पथदिवे दुरुस्तीचे काम असल्याचे त्यासाठी सांगितले गेले. परदेशी व त्याचे तीन सहकारी तेथे पोहोचताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. युनूस शेख हाच यातील मास्टरमाईंड मानला जात आहे.
एसपी साहेब, मुकुंदनगरमध्ये कोम्बिंग ऑपरेशनची गरज!
मुकुंदनगर हे उपनगर अलिकडे प्रचंड बदनाम झाले. याचा अर्थ तेथे राहणारे सारेच बदमाश आहेत असेही नाही. मात्र, काही अपप्रवृतींमुळे या भागाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. ड्रग्ज आणि एमडी याने व्यवसनाधीन झालेले तरुण परिसरातील मोकळ्या जागेत खुलेआम नशा करताना दिसतात. त्यासाठी लागणारे इंजेक्शन खुलेआम मिळतात. ड्रग्जचा खुलेआम बाजार मुकुंदनगरमध्ये भरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील एका नामांकीत माजी नगरसेवकाचे यासाठी पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. हिंदू समाजाच्याच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या तरुणींची देखील दिवसाढवळ्या छेड काढण्यापर्यंत येथील कथीत टोळ्यांची मजल गेली आहे. याबाबत भिंगार कँप पोलिसांकडे अनेकदा तक्रारीही झाल्या. त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे हे सारे परिणाम आहे. या भागात कोंबींग ऑपरेशन राबविण्याची आवश्यकता असून ते धाडस आता पोलिस अधीक्षक या नात्याने सुदर्शन ममुका यांनी दाखविण्याची गरज आहे







