
उप संपादक मन्सूर तडवी
यावल / रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अति दुर्गम भागातील आदिवासी प्रश्न तात्काळ सोडवावेत, अन्यथा एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालय, यावल येथे साखळी उपोषण करू, असा इशारा आदिवासी तडवी भिल एकता मंच, महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात आला आहे. या बाबतचे निवेदन मा. प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले आहे.
मंचाचे मराठवाडा अध्यक्ष युनूस सायबू तडवी, यावल तालुका अध्यक्ष युसूफ इस्माईल मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रशीद दादा तडवी, जिल्हासंघटक रब्बील इदबार तडवी यांच्यासह अल्लाउद्दीन सिकंदर तडवी, तालुका सदस्य याशीन सुभान तडवी, रज्जाक रमजान तडवी, आशिफ मेहरबान तडवी आशिक सिकंदर तडवी सोहेब तडवी यांनी हे निवेदन दिले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या अशा –
१) दुर्गम गावांना रस्ते द्या: रावेर तालुक्यातील अति दुर्गम भागात वसलेले गाडऱ्या, जामन्या, उसमळी आणि लंगडाआंबा या चारही आदिवासी गावांना जोडणारे रस्ते तात्काळ करून द्यावेत. पावसाळ्यात रस्त्याअभावी या गावांचा संपर्क तुटतो.
२) शबरी महामंडळाचे कर्ज त्वरित वाटप करा: शबरी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक अंतर्गत सन २०२४-२५ मधील कर्ज योजना मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कर्ज मिळालेले नाही. ते लवकरात लवकर वितरित करावे. तसेच इतर सर्व शासकीय योजनांवर सबसिडी असताना शबरी महामंडळाच्या योजनेला सबसिडी नाही. तरी या योजनेला ३५ टक्के सबसिडी लागू करावी व लाभार्थी सहभाग हिस्सा माफ करावा,
३) वनहक्क दावे निकाली काढा: अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क कायदा २००६ व नियम २००८ अंतर्गत प्रलंबित असलेले सर्व दावे लवकरात लवकर निकाली काढावेत.
वर नमूद केलेल्या मागण्यांवर प्रकल्प अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या साखळी उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.







