
पाचोरा प्रतिनिधी / शेख जावीद
सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, धरण सुमारे ९५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे पुढील काही तासांत अथवा दिवसांत पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने गिरणा नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
धरणातील पाणीसाठा सुरक्षित पातळीवर ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर नदीलगत राहणारे नागरिक, शेतकरी तसेच नदीपात्राच्या परिसरात वावर करणाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे. नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
विशेषतः नदीपात्रात पोहण्यासाठी, मासेमारीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने जाणे टाळावे. तसेच नदीवरील बंधारे, पूल, घाट आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ गर्दी करू नये. पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने कोणताही धोका पत्करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर अथवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अफवा पसरवू नये किंवा त्याला बळी पडू नये. अधिकृत माहिती ही केवळ जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडूनच घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल, पोलीस, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आवश्यक त्या सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी स्वतःची तसेच कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, सतर्क राहावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.







